Tuesday 27 July 2021

गुळवेल चे फायदे जाणून घ्या

 गुळवेल चे फायदे जाणून घ्या (Gulvel Benefits In Marathi)

आयुर्वेदाची महती आपल्या सर्वांनाच माहीत आहे. आयुर्वेद ही 5000 वर्षापूर्वीपासून म्हणजे पार वेदीक काळापासून चालत आलेली उपचार पद्धती आहे. खरंतर ही केवळ उपचार पद्धती नसून एक जीवनशैली आहे. कारण आयुर्वेदात फक्त रोगांपुरता विचार मर्यादित न ठेवता तन, मन आणि आत्मा ह्यांचे संतुलन साधून उपचार केला जातो. ज्याचा दीर्घकाळासाठी आपले आरोग्य चांगलं राहण्यास फायदा होतो. आयुर्वेदाची पाळंमुळं जरी भारतातील असली तरी जगभरात ह्या उपचार पध्दतीचा वापर केला जातो. आयुर्वेदानुसार वात, पित्त आणि कफ या तिन्ही मूलत्तवांचे संतुलन साधल्यास तुम्हाला कोणताही रोग होत नाही. पण जेव्हा ह्यांचं संतुलन बिघडतं, तेव्हा आपल्याला एखादा आजार होतो. म्हणूनच आयुर्वेदात ह्या तिन्ही तत्त्वांचं संतुलन राखलं जातं. यामध्ये सर्वात चांगली वनसप्ती मानली जाते ती गुळवेल. गुळवेल खाण्याचे फायदे अनेक आहेत. या लेखातून आपण गुळवेल ची माहिती घेणार आहोत. गुळवेल चे फायदे (Giloy Benefits In Marathi), गुळवेल चे दुष्परिणाम, गुळवेल चा उपयोग कसा करून घ्यावा याची इत्यंभूत माहिती आम्ही तुम्हाला या लेखातून देत आहोत. त्याआधी गुळवेल म्हणजे नक्की काय ते आपण पाहू.

 गुळवेल म्हणजे काय ?

गुळवेल एक वनस्पती आहे जी मुख्यत्वे जंगल, शेतातील चिखल अथवा डोंगरावर मिळते. ही उष्ण प्रकृतीची असते. याचे फळ साधारण वाटाण्याच्या आकाराचे दिसते. उन्हाळ्याच्या दिवसात या वनस्पतीवर लहान लहान आकाराची पिवळी फुलं दिसून येतात. जी नर झाडावर एकत्र फुललेली दिसतात आणि मादी झाडावर मात्र एकट्या स्वरूपात असतात. यावरूनच झाड नक्की कोणत्या स्वरूपाचे आहे ते कळून येते. गुळवेलचे वैज्ञानिक नाव हे टीनोस्पोरा कार्डिफोलिया असं आहे. यामध्ये अनेक आजार बरे करण्याची क्षमता असते. त्यामुळे गुळवेलला अमृतासमान मानले जाते. सर्वात खास वैशिष्ट्य म्हणजे गुळवेल हे झाडाला अगदी मिठी मारून वाढते. त्यामुळे त्या झाडाचे औषधीय गुणही गुळवेलामध्ये समाविष्ट होतात. त्यामुळे जर कडुलिंबाच्या झाडावर गुळवेल वाढवली तर ती अत्यंत लाभदायी मानली जाते. 


महाराष्ट्रांमध्ये सगळीकडे गुळवेल ही वनस्पती सर्वत्र आढळते. या वेलीचे खोड लांब धाग्यांसारखे आणि बोटांएवढे जाड असून त्यावरील सालंही पातळ आणि त्वचेप्रमाणे असतात. काही कालावधीनंतर त्याची सालं निघतात. या खोडांंवर लहान-लहान छिंद्रसुध्दा आढळतात. या वेलीच्या खोडातील आतला भाग चक्राकार दिसून येतो. वेलीची हिरवीगार मुळे फुटून खाली लोंबताना आढळतात. पानांचा आकार हा हृदयाकृती आणि रंग हिरवागार असतो. वेलीची पानं हाताला गुळगुळीत लागतात आणि देठ लांबच लांब असतात, ह्या येणारी फुले ही पिवळसर-हिरवी असून नियमित येतात. फळंसुध्दा गोलाकार, मोठ्या वाट्याण्यासारखी पण कठीण कवचाची असतात. साधारणतः या वनस्पतीला नोव्हेंबर ते जून या दरम्यान फुले आणि फळे येतात. गुळवेलाचे फायदे व नुकसान दोन्ही असतात. पण आपण आधी गुळवेलाचे फायदे जाणून घेऊया.

 गुळवेलाचे फायदे (Gulvel Benefits In Marathi) 

गुळवेलाचा उल्लेख आयुर्वेदात अमृतकुंभ असा आहे. तसंच ह्याला रसायनकल्प ही म्हंटले जाते. खरोखरच गुळवेल ही अगदी अमृताप्रमाणेच आहे. कुठल्याही आजारातून उठल्यावर रूग्णाच्या शरीराला पुनरुज्जीवन देण्यात गुळवेल उपयोगी ठरते. गुळवेलीचा काढा हा अत्यंत परिणामकारक आहे. याचा अनेक आजारांवर फायदा होतो. नक्की कोणकोणते फायदे आहेत ते जाणून घेऊया. 


प्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी (Immunity System)

प्रतिकारशक्ती कमी होणे हेच मुळात आजारी पडण्याचे मुख्य कारण आहे. प्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी आपण अनेक उपाय करतो. कोणताही आजार हा प्रतिकारशक्ती कमी झाल्यावरच होतो. त्यानुसार तुम्ही गुळवेलचे सेवन करू शकता. प्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी गुळवेल अत्यंत लाभदायी आहे असं आयुर्वेदातही सांगण्यात आले आहे. यामध्ये इम्यूनोमॉड्युलेटरी नावाचा घटक अधिक आढळतो. जो प्रतिकारशक्ती वाढविण्यास मदत करतो.

 क्रोनिक फिव्हर व्यवस्थित करण्यासाठी (Chronic Fever)

 साधारण 10-15 दिवसांनंतरही तापाची समस्या कमी होत नसेल तर त्याला क्रोनिक फिव्हर अर्थात जुना ताप असं म्हटलं जातं. तुम्ही या समस्येवर गुळवेलाचा उपयोग करून घेऊ शकता. हा ताप काढण्यासाठी तुम्हाला गुळवेलाचा उपयोग करता येतो. यासाठी तुम्ही गुळवेलाची फळं आणि पानांचा वापर करून काढा बनवू शकता. यामध्ये असणारे अँटिपायरेटिक (ताप बरा करणारा घटक) आणि अँटिमलेरियल (मलेरिया इन्फेक्शन दूर करणारा घटक) गुण तापासून सुटका मिळवून देतात. तुम्हाला हवं तर गुळवेलाची पावडर कोमट पाण्यात मिक्स करूनही घेऊ शकता. 


पचनक्रिया चांगली करण्यासाठी (Digestive System)

सध्याच्या लाईफस्टाईलमुळे अन्न पचनाची अनेकांना समस्या असते. उशीरा जेवण आणि सतत ताण यामुळे पचनक्रिया व्यवस्थित होत नाही. गुळवेलाची औषधीय गुणांमध्ये पचनक्रियेसंबंधी समस्या दूर करण्याची गुण आहेत. डायरिया आणि जुलाब होत असतील तर त्यासाठीही हे उत्तम ठरते. पचनतंत्र मजबूत करण्यासाठी याचे साह्य मिळते. त्यामुळे तुम्हाला जुलाब होत असतील तर तुम्ही गुळवेलाचा आधार घ्या. 


मधुमेह नियंत्रणात आणण्यासाठी (Diabetes Control)

बदलत्या लाईफस्टाईलमुळे आजकाल फारच लहान वयात अनेकांना मधुमेहाच्या समस्यांना सामोरं जावं लागतं. पण गुळवेलाच्या पावडरचे नियमित तुम्ही उपाशीपोटी पाण्यातून सेवन केल्यास, मधुमेह आटोक्यात येण्यास मदत मिळते. मधुमेहावर उत्तम घरगुती उपाय आहे. यामध्ये असणारे अँटिहायपरग्लायसेमिक (रक्तातील साखरेची पातळी कमी करणारा घटक) गुण आढळतात. यामुळेच शरीरातील इन्शुलिनची सक्रियता वाढवून साखरेची पातळी नियंत्रित करण्यासाठी मदत मिळते. मधुमेहापासून सुटका मिळविण्यासाठी हा उत्तम उपाय असल्याचे मानले जाते. 


डेंग्युवरही लाभदायक (Dengue)

गुळवेल हे औषधीय गुणांचे भंडार समजण्यात येते. यामध्ये अशी अनेक रसायने आहेत ज्यामुळे इम्यूनमॉड्युलेटरी प्रभाव अधिक जाणवतो. यामुळे शरीरातील प्रतिकारशक्ती वाढून अनेक आजारांपासून लढण्याची ताकद मिळते. यामध्ये मलेरिया आणि डेंग्यू सारख्या आजारांचीही नावे आहेत. याचे इन्फेक्शन दूर करण्यासाठीही गुळवेलाचा वापर करता येतो. त्यामुळे डेंग्युसारख्या आजारात गुळवेल लाभदायक ठरते. याचे निमयित सेवन तुम्हाला डेंग्यूचा ताप उतरवण्याठी मदत करते. 


दम्याकरिताही ठरते उपयोगी (For Asthma)

दम्याच्या समस्येपासून सुटका मिळविण्यासाठीही गुळवेल चे फायदे मिळतात. शरीरातील प्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी श्वासासंबंधी समस्या सोडविण्यासाठीही याचा उपयोग होतो. दम्याची लक्षणे कमी करण्याची प्रबळ क्षमता गुळवेलामध्ये आहे. त्यासाठी तुम्ही याचा रस मधासह मिक्स करून सेवन करा. त्यामुळे दम्याचा त्रास कमी होण्यास मदत मिळेल.

 सूज :- 

विशेषतज्ज्ञांच्या माहितीनुसार, गुळवेलामध्ये अँटि इन्फ्लेमेटरी (सूज कमी करणारे), अँटिअर्थरायटिक (सांध्याची सूज कमी करणारे घटक) आणि अँटिऑस्टियोपोरोटिक (सांध्याचे दुखणे आणि सूज कमी करणारे घटक) असे गुण आढळतात. या तिन्ही गोष्टी कमी करण्यासाठी गुळवेलाचा फायदा मिळतो. त्यामुळे तुम्ही गुळवेलाचे कशाही स्वरूपात सेवन केल्यास तुम्हाला त्याचा शरीरावर सूज असल्यास, फायदा मिळतो. तुम्ही यापासून सुटका मिळविण्यासाठी नियमित स्वरूपात याचे सेवन करू शकता. मात्र याचे योग्य प्रमाण डॉक्टरांना विचारून घ्यावे. 

सेक्सची इच्छा प्रबळ करण्यासाठी (To Increase Sex)

शारीरिक आरोग्य आणि यौन अर्थात सेक्स करण्याची इच्छा होणे याचा एकमेकांशी संबंध आहे. कारण जेव्हा माणूस शारीरिक स्वरूपात निरोगी असतो तेव्हाच उत्तम सेक्स करू शकतो. सेक्सची इच्छा वाढवणारे हार्मोन्स काही काळाने कमी होतात. पण गुळवेलात असणाऱ्या इम्यूनोमॉड्युलेटरी अर्थात शरीरात प्रतिकारकशक्ती वाढविणारे गुण असतात, जे इतर रोगांशी लढण्यासह एफ्रडिजीयॅक प्रभावामुळे सेक्सची इच्छा वाढविण्यास मदत करतात.

 डोळ्यांच्या समस्येसाठी (For Eyes Problem)

eyes tips

डोळ्यांच्या समस्येवरही गुळवेल गुणकारी ठरते. विशेषतज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार, यामध्ये असणारे इम्यनोमॉड्युलेटरी गुण हे डोळ्यांसाठी फायदेशीर ठरतात. डोळ्यांची जळजळ, डोळे लाल होणे अथवा डोळ्यांना सूज येणे अशा समस्यांसाठी तुम्ही गुळवेल पावडर रोज पाण्यातून सेवन केली तर त्यातून सुटका मिळण्यास मदत मिळते. योग्य प्रमाणात तुम्ही रोज याचे सेवन करावे. 


चमकदार त्वचेसाठीही प्रभावी (To Maintain Good Skin)

अनेक रासायनिक तत्वांच्या उपलब्धतेमुळे गुळवेलात अँटिएजिंग घटक आढळतात. त्यामुळे शरीरातील आजार दूर करण्यासह वाढत्या वयाचा त्वचेवर होणारा परिणाम कमी करण्यासाठीही याचा उपयोग करून घेता येतो. याचे संतुलित प्रमाणात तुम्ही नियमित सेवन केले तर तुमची त्वचा अधिक चमकदार राखण्यास आणि त्वचेवर सुरकुत्या न येऊ देण्यासाठी याचा उपयोग होतो. 


गुळवेलाचा कसा वापर कराल (How To Use Gulvel In Marathi)

गुळवेलाचा उपयोग कसा करायचा हे बऱ्याच जणांना माहीत नसतं. तर तुम्ही याचा कसा उपयोग कराल हे आम्ही तुम्हाला सांगत आहोत. 

तुम्ही गुळवेलाच्या फळांचा आणि पानांचा रस काढून त्याचा वापर करू शकता. दिवसातून 20-30 मिली इतका दोन वेळा हा रस तुम्ही प्यावा

तसंच काढ्याच्या स्वरूपात तुम्ही 20 मिली इतका उपयोग करू शकता. दिवसातून दोन वेळा गुळवेलाचा काढा पिऊ शकतो. त्यासाठी तुम्ही गुळवेलाच्या काड्यांचा उकळून उपयोग करून घेऊ शकता

तसंच याच्या बियांचा तुम्ही उपयोग करू शकता

गुळवेलाची पावडर बनवून रोज सकाळी उपाशीपोटी कोमट पाण्यातून एक चमचा प्यायल्यास मधुमेह कमी होतो

टीप - गुळवेल किती प्रमाणात घ्यायचे याबाबत आपल्या आयुर्वेदिक डॉक्टरांशी चर्चा करा आणि मगच ठरवा. स्वतःच्या मनाने याचे सेवन करू नका. 


गुळवेलचा काढा कसा बनवावा (How to Make Giloy Kadha In Marathi)

गुळवेलाची भरड किंवा काड्या आणून ते प्रथम स्वच्छ धुवून घ्यावे

काढा करण्यासाठी 1 कप गुळवेल घेतल्यास त्याच्या 16 पट पाणी घालावे. 

हे मिश्रण पावपट होईपर्यंत उकळून घ्यावे. हा काढा चवीला कडसर लागतो. पण अत्यंत गुणकारी आहे

गुळवेल चे दुष्परिणाम (Side Effects Of Gulvel In Marathi)

गुळवेल ही वनस्पती किती फायदेशीर आहे. ते आपण बघितलं पण काही परिस्थितींमध्ये याचे सेवन करणे नुकसानदायक किंवा त्याचे दुष्परिणाम ही दिसून येतात


जर तुम्ही मधुमेहाची औषध घेत असाल तर गुळवेलाचे सेवन करू नका

गर्भवती आणि स्तनपान करणाऱ्या महिलांनी गुळवेल अजिबात खाऊ नये. त्याचे कोणत्याही प्रकारे सेवन करू नये.

शस्त्रक्रिया झाल्यावरदेखील याचा वापर टाळावा

Monday 26 July 2021

मेहंदी चे आयुर्वेदिक गुणधर्म

 *आरोग्य धनसंपदा*


*मेहंदी चे आयुर्वेदिक गुणधर्म*


1) *डोकेदुखी व पित्त* –

गरमी किंवा पित्ताने डोके दुखत असल्यास 25 ग्रॅम मेहंदीची पाने 50 ग्रॅम तिळाच्या तेलात उकळून हे तेल डोक्याला लावावे किंवा 10 ग्रॅम मेहंदीची फुले 100 ग्रॅम पाण्यात उकळून ते पाणी पिण्याने लाभ होतो.


2) *तोंड आल्यावर* –

10 ग्रॅम मेहंदीची पाने , 200 ग्रॅम पाण्यात उकळून त्या पाण्याने गुळण्या कराव्या.


3) *केस रंगविण्यासाठी* –

मेहंदीची पावडर, लिंबाचा रस, आवळा पूड, चहाचे पाणी हे सर्व रात्रभर लोखंडी भांड्यात भिजवून, सकाळी केसांना लावावे व 2 - 3 तासांनंतर कोमट पाण्याने धुवावे. केस नैसर्गिकरित्या रंगतात सतेज व मुलायम होतात.


4) *अत्तरासाठी*-

मेहंदीच्या फुलापासून अत्तर तयार होते.याला हीना असे म्हणतात.


5) *घश्याला सूज व तोंड आल्यास* –

मेहंदीच्या पानांच्या काढयाने गुळण्या कराव्या.


6) *आवेवर* –

मेहंदीच्या बिया पाण्यात उकळून ते पाणी पिण्यास द्यावे.


7) *हात व पाय सजविण्यासाठी*-

पूर्वी काही विशिष्ठ समाजात किंवा प्रांतात उदा. राजस्थान, गुजराथ इ. लग्नसमारंभात किंवा धार्मिक कार्यात स्रियांनी, विशेषत: नववधुनी मेहंदीने हात सजविण्याची रीत होती. पण आजकाल मात्र संपूर्ण भारतभर शुभकार्यात मेहंदी काढण्याची प्रथा फार प्रचलित झाली असून,मेहंदीचा कार्यक्रम हा एक वेगळा कार्यक्रम प्रत्येक लग्नकार्यात अगदी आवर्जून असतो. अत्यंत कलाकुसरीने सुंदर नक्षीदार नक्षीने नववधू व इतरांचे हात व पाय रंगलेले दिसतात.


*निरोगी सुप्रभात....*

सर्दि व पडसे सतत असणं

 *आरोग्य धनसंपदा*


*सर्दि व पडसे सतत असणं*

        *कारणे*


१) उष्णतेची व साधी सर्दी होणे.

२) वातावरणातील बदल.

३) पोट साफ नसणे.

४) वारंवार होणारा कफ.

५) जागरण करणे.

           *उपाय*

 १) नियमित देशी गाईचे तूप नाकात किंवा बोटाने लावा. ( रात्री  झोपते वेळी व सकाळी उठल्यावर ) हा एक चांगला उपाय आहे.

२) आले [ आद्रक ] + दालचिनी+ खडीसाखर+ गवती चहा+  तुळशीची  पाने+ काळी मिरे यांचा काढा घ्या.

३) निलगिरी तेल रूमालावर टाकून वास घ्या.

४) सकाळी ७/८ तुळशीची पाने + २/३  काळी मिरे खा.

५) वारंवार गरमच पाणी प्या.

६) दूध+ हळद+ खडिसाखर घ्या.

  आले [ आद्रक ]+ गूळ मिक्स करून गोळ्या करा. व गरम पाण्यात मिसळून घ्या.

७) २/३ चमचे कांद्याचा रस + तितकाच मध मिक्स करून खाणे.

 आले रस+ तुळशीची पाने रस + मध घ्या.

८) रात्रि झोपण्यापूर्वी गूळ खा. मात्र पाणी पिऊ नये. सकाळपर्यंत सर्दी गायब होईल.

९) हातापायांच्या बोटांवरील अग्र भाग ( सायनस)  प्रेस करा.

१०) नियमित नाकात तूप लावून प्राणायाम करा. विषेशतः *भस्रिका व अनुलोम विलोम जास्त करा.*

 नाकाचे मांस/ हाड ( polyps ) 

 कधीच वाढणार नाही.




किडनि स्टोन

 *आरोग्य धनसंपदा*


*किडनि स्टोन*


१) तुळस-तुळशीचा नियमित चहा घ्यावा. ओवा व तुळशिची पाने याचे चूर्ण सकाळी रिकाम्या पोटी घेतल्यास मूतखडा विरघळतो. त्वरित.

२)  कुळिथ-रोज रात्री ४० ते ५० ग्रँम कुळिथ पाण्यात भिजवून ते सकाळी कुस्करून व गाळून  २-३ 

 महिने घेतल्यास मूतखडा विरघळून निघून जातो.

३) द्राक्षांच्या वाळलेल्या वेली आणून त्या जाळून त्याची राख मधातून घ्यावी. स्टोन लवकर  विरघळतात.

४) काकडीचे मगज, ज्येष्ठमध व दारूहळदीचे चूर्ण तांदळाच्या धुवणासोबत घेतल्यास स्टोन विरघळून  बाहेर पडतात.

५)  हळद व एक वर्षापूर्विचा गूळ नियमित खाल्यास स्टोन तुटुन बाहेर पडतो.

६)  कडुलिंबाच्या पानाची राख २ ग्रँम पाण्यासोबत नियमित खाल्यास मूतखडा विरघळतो.

७)  जर खडा लहान असेल तर मेहंदीचे साल वाटून चूर्ण करावे व  सकाळी अर्धा चमचा नियमित घेतल्यास मूतखडा विरघळतो.

८)  पुनर्नवासव, चंद्रप्रभा वटी घ्यावी.

९) पाषाणभेद वनस्पती व गोखरू काटे यांचे समप्रमाणात मिसळलेले चूर्ण २ ग्रँम रोज  एक वेळ सकाळी रिकाम्या पोटी पाण्यासोबत द्यावे.

 त्यानंतर ४-५  तास तोंडाने काही खाउ पिऊ नये. ..

....ज्यांना त्रास असेल त्यांनी जरूर  हे करुन पहावे.


अर्थात वैद्यकीय सल्ला अधिक महत्त्वाचा.


*निरोगी सुप्रभात.....*

Tuesday 20 July 2021

श्रीमंत व्यक्ती

 जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती. 


 *एक सुंदर कथा* ...

        

        🐪


 एका व्यापार्याला बाजारात एक भव्य उंट विकत घ्यायचा होता आणि एक उंट निवडल्यानंतर त्या उंटाची किंमत ठरवण्यासाठी उंट विक्रेता व व्यापारी यांच्यात बोलणी सुरू झाली . 


 व्यापारी आणि उंट विक्रेत्यामध्ये बराचदा करार झाला आणि शेवटी त्या व्यापा्याने उंट विकत घेऊन घरी नेला !


 घरी पोहोचल्यावर व्यापा्याने आपल्या नोकराला उंटाचा काजवा (खोगीर) काढण्यासाठी बोलावले ..!


  काजवेच्या खाली सेवकास एक लहान मखमली पिशवी सापडली ज्यामुळे उघडकीस आले की ते मौल्यवान हिरा रत्नांनी परिपूर्ण आहेत  ..!


 सेवक ओरडला, "बॉस, तू एक उंट विकत घेतला, परंतु त्याबरोबर काय विनामूल्य आले आहे ते पहा!"


 व्यापारी देखील आश्चर्यचकित झाला, त्याने आपल्या नोकरांच्या हातात हिरे पाहिले. ते सूर्यप्रकाशामध्ये आणखी चमकत होते आणि चमकत होते.


  व्यापारी म्हणाले: 

  "मी उंट खरेदी केला आहे, हिरे नव्हे, मी ते त्वरित परत करावे!" 


 नोकर मनात विचार करत होता "माझा बॉस किती मूर्ख आहे ...!"


 तो म्हणाला:

  "मालक कोण आहे हे कुणालाही कळणार नाही!"  तथापि, व्यापार्याने त्याचे ऐकले नाही आणि ताबडतोब बाजारपेठेत पोचले आणि मखमलीची पिशवी त्या दुकानदाराला परत केली. 


 उंट विक्रेता खूप खूष झाला, म्हणाला, "मी विसरलो होतो की मी माझे मौल्यवान दगड काजवेखाली लपवले होते!


 आता आपण बक्षीस म्हणून कोणताही एक हिरा निवडा!


  व्यापारी म्हणाला, 

  "मी उंटासाठी योग्य किंमत दिली आहे म्हणून मला कोणत्याही भेटवस्तू आणि बक्षिसाची आवश्यकता नाही!" 


 जितका व्यापारी नकार देत होता, तितकाच उंट विकणारा आग्रह धरत होता!


 शेवटी, व्यापारी हसला आणि म्हणाला: 

 खरं तर मी बॅग परत आणण्याचा निर्णय घेतला तेव्हा मी दोन मौल्यवान हिरे आधीच माझ्याकडे ठेवले होते. 


 या कबुलीजबाबा नंतर, उंट विक्रेता खूप चिडला  आणि त्याने पटकन बॅग रिकामी केली आणि त्याचे हिरे मोजले !


 पण जेव्हा त्याला लक्षात आले की त्याचे सर्व हिरे जशाला तसे आहेत अन एकही हिरा कमी झालेला नाही तेव्हा तो म्हणाला, “हे माझे सर्व हिरे आहेत, तर मग तुम्ही ठेवलेले दोन सर्वात मौल्यवान गोष्टी  कोणत्या होत्या ?


 व्यापारी म्हणाले: ... 

 *"माझा प्रामाणिकपणा आणि माझा स्वाभिमान."*


 विक्रेता मूक होता!


 यापैकी 2 हिरे आपल्याकडे आहेत की नाही हे शोधण्यासाठी आपण स्वतःमध्ये पहावे. 


 *ज्याच्याकडे हे दोन हिरे आहेत, स्वाभिमान अन प्रामाणिकपणा आहे तो जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती आहे.*                                         🌹🌹🙏🏻🙏🏻🌹🌹

मरतुकडी गाय

 *मरतुकडी गाय*

चिनमधले एक विद्वान गुरू आपल्या काही शिष्यांसह प्रवासाला निघाले. त्यांना एक ओसाड प्रदेश लागला. त्या प्रदेशात पाण्याचे दुर्भीक्ष होते तर गवताचे एक पान पण दिसत नव्हते. त्या प्रदेशातील एका टेकडीवर त्यांना एक जिर्ण झालेली, मोडकळीला आलेली झोपडी दिसली. या अशा ओसाड प्रदेशात कोण रहात असावे या कुतुहलाने ते त्या झोपडीजवळ गेले. तेथे त्यांना एक मध्यमवयीन चिनी जोडपे, त्यांची तीन लहान मुले व एक मरतुकडी गाय दिसली. *‘तुमचे कसे भागते?’* गुरुंनी त्या चिनी माणसाला विचारले. त्याने त्या मरतुकड्या गाईकडे बोट दाखवले व म्हणाला, ‘ही गाय रोज आम्हाला थोडे थोडे दूध देते. यातील काही दूध आम्ही वापरतो. उरलेल्या दूधाचे दही करून त्याचे लोणी तयार करून जवळच्या गावात जाऊन विकतो. त्याचे जे काही थोडेफार पैसे मिळतात त्यातुन इतर गरजेच्या वस्तु आणतो. *आमचे कसेतरी भागते.’*


गुरु टेकडी उतरून खाली आले व आपल्या शिष्यांना म्हणाले, *‘ताबडतोब ती मरतुकडी गाय पळवून आणा!’* गुरुंची ही आज्ञा ऐकून शिष्य चांगलेच गोंधळले. ज्या गाईवर त्या माणसाचे जीवन चालू आहे, त्या कुटुंबाला रोजी रोटी मिळते आहे ती गाय आपण का पळवून आणायची? शिष्यांना वाटले आपले गुरु किती निर्दय व निष्ठूर आहेत. कोणी शिष्य गाय पळवून आणायला तयार होईना. शेवटी हे काम गुरुंनी स्वतःच करायचे ठरवले. ‘बोला माझ्याबरोबर कोण येणार आहे?’ त्यांनी शिष्यांना विचारले. कसाबसा एक शिष्य तयार झाला. त्या रात्री गुरु त्या शिष्याला घेऊन गाय पळवून आणली व ती मरतुकडी गाय आपल्या शिष्यांबरोबर पुढच्या प्रवासाला जाताना नवीन प्रदेशामधील गायीच्या गोठ्यात दान केली. 


त्यांच्या बरोबर जो शिष्य गेला होता त्याला फार ‘गिल्टी फिलिंग’ येऊ लागले. गुरुंनी जे केले ते पाप होते व त्या पापामध्ये आपण पण भागीदार होतो असे वाटून त्याच्या मनात शरमेची भावना निर्माण झाली. काही वर्षे त्याने ही भावना दाबून ठेवली पण एक दिवस या भावनेचा उद्रेक झाला. त्या कुटुंबाचे काय झाले हे पहाण्याची इच्छा त्याच्या मनात निर्माण झाली. *गुरुला न कळवताच तो त्या झोपडीच्या ठिकाणी आला.*


तेथे आल्यावर त्या शिष्याला आश्चर्याचा धक्काच बसला. *त्या क्षेत्राचा संपूर्णपणे कायापालट झाला होता.* झोपडीच्या जागी एक आधूनीक, टोलेजंग बंगला उभा होता. बंगल्याच्या बाहेर अनेक आधुनीक मोटारी उभ्या होत्या. बंगल्याभोवती सुरेख बगीचा केला होता. सगळीकडे हिरवळ होती व काही शेते पण दिसत होती. शिष्याला वाटले आपण चुकीच्या ठिकाणी आलो. त्यांने तिथल्या एका माणसाला विचारले, ‘मा॑फ करा! मी कांही वर्षांपूर्वी येथे आलो होतो तेव्हा हा भाग ओसाड होता. वरती टेकडीवर एक झोपडी होती. आता त्या झोपडीतील माणसे कुठे असतात?’


*‘तुमचे म्हणणे बरोबर आहे!’* त्या माणसाने उत्तर दिले. ‘त्या झोपडीतील माणसे इथेच म्हणजे त्या बंगल्यात रहातात. हा त्यांचा बंगला आहे. आज त्यांच्याकडे फंक्शन आहे.’ 


आश्चर्य वाटून तो शिष्य टेकडी चढून बंगल्यापाशी आला. त्याने पाहीले की तोच चिनी माणूस व त्याची बायको एका भव्य सोफ्यावर बसले आहेत व त्याची तीन तरूण मुले उत्साहाने सगळ्यांचे स्वागत करत आहेत. तो शिष्य त्या बंगल्यात गेला व त्या चिनी माणसाला म्हणाला, ‘काही वर्षांपूर्वी मी माझ्या गुरुंबरोबर येथे आलो होतो. त्यावेळी तुम्ही एका मोडक्या, जिर्ण झालेल्या झोपडीत तुमच्या तीन मुलांबरोबर रहात होतात. तुमच्याकडे एक हडकूळी गाय पण होती.’


‘अगदी बरोबर आहे.’ तो चिनी माणूस उत्तरला ‘एका रात्री आमची गाय चोरीला गेली.  आमचा तर आधारच हरपला. *जगायचे कसे हा प्रश्न उभा राहीला*. कारण तोपर्यंत आम्हाला गायीच्या दुधावरच जगायची सवय होती. जगण्यासाठी प्रयत्न करणे आवश्यक होते. हळू हळू आमच्या असे लक्षात येऊ लागले की *आमच्याकडे अनेक कौशल्ये आहेत* जी आम्हाला ठाऊक नव्हती. आम्ही त्या कौशल्यांचा विकास करायला सुरवात केली, *उद्योग व्यवसायात पदार्पण केले.* हे तीन तरूण ही माझी मुले आहेत. तुम्ही याचे परिणाम बघतच आहात. जर *आमची गाय गेली नसती तर हे घडले नसते!’*


आता त्या शिष्याला कळले की गुरु गाय पळवून न्यायला का सांगत होते. त्याला आपल्या गुरुंच्या दूरदृष्टीचे कौतुक वाटले व *गुरुविषयींचा आदर कित्येक पटीने वाढला.*


अनेक मराठी माणसांच्या आयुष्यात अशीच एक गाय असते ज्याला *‘नोकरी’* असे म्हणतात. मराठी माणसांची नजर या अशा गायीवरच असते. या गाइचे जे दूध मिळते *(म्हणजे पगार मिळतो)* त्यावर भागवण्याची सवय लागते. कोणाच्या नशीबात धष्टपुष्ट गाय येते तर कांहीना किरकोळ गाय मिळते तर काहींच्या नशीबात अशी गायच नसते. 


मराठी माणसाचे सगळे कर्तृत्व त्याच्या नोकरीवर व नोकरीच्या प्रगतीवर ठरत असते. ज्याला उत्तम नोकरी मिळते तो जास्त कर्तृत्ववान, ज्याला बरी नोकरी मिळते तो कमी कर्तृत्ववान व ज्याला नोकरीच मिळत नाही त्याला ‘कंडम’ समजण्यात येते. मराठी माणसाची प्रगती ही त्याच्या नोकरीच्या प्रगतीवर ठरत असते. *‘माझा नवरा क्लार्कचा मॅनेजर झाला*’ हे एखाद्या गृहीणीचे वाक्य मोठ्या कौतुकाने सांगीतले जाते व ऐकले जाते. जणू काही नवरा क्लार्कचा मॅनेजर झाला म्हणजे त्याने फार मोठा पराक्रम केला असा थाट या वाक्याभोवती असतो. पण किती झाले तरी *‘नोकरी’* ही एक मरतुकडी गायच असते, कारण ही गाय पुरेसे दूध कधीच देत नसते. 


अशीच अजुन एक गाय असते ज्याला ‘जर्सी’ गाय म्हणतात. ही गाय भरपूर दूध देत असते पण ही गाय नोकरीवाल्यांच्या नशीबी नसते तर फक्त *‘उद्योग, धंदा, व्यवसाय’ करणा-या* माणसांच्या नशीबी असते. पण मराठी समाजात या गाईला कोणी फारसे महत्व देत नसते. *‘माझ्या नव-याचा धंदा एका लाखाचा एक कोटी रुपये झाला*.’ हे एखाद्या गृहीणीचे वाक्य फारशा कौतुकाने बोलले पण जात नाही व ऐकले पण जात नाही. ‘माझे वडील बँकेत मॅनेजर आहेत.*’  हे वाक्य ज्या अभीमानाने मुलाकडून सांगीतले जाते त्याच अभीमानाने  ‘माझ्या वडिलांचे स्टेशनरीचे दुकान आहे’* हे वाक्य सांगीतले जात नाही. *लग्न करणा-या मराठी मुलींना तर फक्त नोकरी करणारीच मुले हवी असतात.* मामलेदार कचेरीत शिपायाची किंवा पट्टेवाल्याची नोकरी करणाऱ्या मुलाला *हुंड्यासकट मुलगी मिळते.* पण वर्षाला 50 लाख रुपये इन्कम असलेल्या पण *धंदा करणा-या मराठी मुलाला लग्नासाठी मुलगी मिळणे कठीण जाते.*


 याचा अर्थ अनेकांना ‘जर्सी गाई’ मिळवण्याची संधी उपलब्ध आहे. पण मराठी माणूस याचा किती फायदा करून घेणार आहे हा कळीचा मुद्दा आहे. 


*‘नोकरी’ च्या मरतुकड्या गाईवर जगायचे,* का उद्योग व्यवसायाच्या क्षेत्रात शिरून भरपूर दूध देणारी जर्सी गाय मिळवायची का दोन्ही गायी संभाळायच्या हे ज्याचे त्याने ठरवायचे नाही का ?


भिकारी कोणाला म्हणायचं?

 *भिकारी कोणाला म्हणायचं?*


परवा ट्रीपला गेलो होतो. यु पी साईडला. यु.पी. पंजाब. जम्मू. काश्मीर.


जम्मू काश्मीर बद्दल खूप उत्सुकता होती. भारतातलं नंदनवन. हिंदू राजा. मुस्लिम जनता. भारताची  फाळणी. 370 कलम. बरच काही वाचलं होतं. शिवाय यु.पी कडील कल्चर. देव देवतांच्या वेगवेगळ्या परंपरा.....


दोन तीन दिवस प्रवास.  एकदाचं मेरठला पोहोचलो. त्या रात्री विश्रांती घेतली.

      

दुसऱ्या दिवशी जम्मूला गेलो. तेथून वैष्णोदेवीला 13 कि.मि. चालत प्रवास. दोन-तीन कि. मी. प्रवास झाला असेल. अचानक रस्त्यावर मला चिनाप्पा सारखा एकजण दिसला. मी चमकलो. पुढे जाऊन बघितलं तर अनोळखी भिकारी होता. तसेच पुढे चालत राहिलो. पण चिनाप्पा डोळ्यासमोरुन हालत नव्हता. 


चिनाप्पा हिवऱ्याचा. माझा क्लासमेट. डोळ्यानं अधु. तोंडानं बोबडा. शरीरानं अपंग. कसातरी खुरडत तो शाळेत येई. पार शेवटच्या कोपऱ्यातील बाकावर बसे. त्याच्या शेजारी कुणीही बसत नव्हतं. शिक्षक पण त्याला लांबूनच छडी मारायचे. अभ्यासात सुमार. पण दिवसभर तो गुणगुणत असायचा. आपल्याच तंद्रीत. आभाळाकडं डोळे लावून. तो शाळेत असला काय, नसला काय, कुणालाचं फरक पडत नसे. 


माझ्याशी तो कधीतरी बोलायचा. गणिताची वही मागायचा. शाळा सुटली की परत द्यायचा. एकदा त्यानं अशीच वही घेतली. पण त्या दिवशी परत दिली नाही. उद्या देईल म्हणून मी गप्प बसलो. दुसऱ्या दिवशी तो शाळेतच आला नाही. असेच दोन तीन दिवस गेले. मग मी त्याच्या घरी जायचे ठरवले. 


एका रविवारी मी आणि चंदू त्याच्या घरी गेलो. जुनाट मोडकळीस आलेलं घर. आई भाकरी करीत होती. वैलावर कालवणाच डीचकं. तव्यात एक भाकरी. चुलीचा आर बाहेर ओढून त्यावर उभी केलेली दुसरी भाकरी. दोन्ही हात पिठानं भरलेलं. केसं भुरभुरतेली. घामानं कुंकू विस्कटलेलं.  डाव्या हातानं केसं माग सारत त्याची आई भाकरी थापतेली....आणि चिनाप्पा खुडूक होऊन झोपलेला. 


आम्ही आल्याचं बघून आई म्हणाली, कुठलं रं तुमी? का आलाय? आम्ही सांगितलं, "वही न्यायला आलोय". आईनं दोन शिव्या हासडल्या. त्याला उठवलं. चिनाप्पानं वही दिली. आम्ही निघून आलो. 


पुढे बरेच दिवस चिनाप्पाच्या आईचं विस्कटलेलं कुंकू सतत नजरेसमोर दिसायचं. 


नंतर नंतर चिनाप्पाने जवळीक वाढवली. कधी कधी बोलु लागला. मागं मागं फिरू लागला. चिनाप्पाला सख्खी आई नव्हती. त्याच्या लहानपणीच आई वारलेली. बापानं दुसरं लग्न केलं. चिनाप्पाला दोन सावत्र भाऊ. एक सावत्र बहीण. पण ते याला जवळ करत नव्हते. त्याच्याशी बोलत पण नव्हते. बाप दारूडा.  कधी तर बाजारातून खायला आणायचा. फक्त तीन पोरांना. उरलं तर चिनाप्पाला. नाही तर चिनाप्पा त्यांच्या तोंडाकडे बघत बसायचा. 


आई खरकटी भांडी घासायला सांगायची. त्याशिवाय भाकरी नाही. चिनाप्पा उपडं बसून कसातरी घासायचा.  


शाळेत त्याला दप्तर नसायचं. वायरची पिशवी. त्यात फाटक्या दोन वह्या. बिन टोपनाची एखादी पेन. झालं याचं दप्तर. दुपारी जेवणाच्या सुट्टीत तो मागे मागे यायचा. आम्ही जेवताना आशाळभूतपणानं बघत बसायचा. कुणी दिली तर भाकरीला नाही म्हणायचा नाही. गपचिप खाली मान घालून खात राहायचा.

     

एकदा खूप पाऊस झाला. दुपारीच शाळा सुटली. आम्ही सगळे घरी गेलो. पाऊस झाला की ओढ्याला पाणी येई. मग गावात जाता येत नसे. म्हणून लवकर शाळा सुटायची.


त्या दिवशी चिनाप्पा शाळेतच झोपला. उपाशी. दुसऱ्या दिवशी आम्ही गेल्यावर कळालं. हा इथेच होता. रात्रभर. एकटाच. त्याचं  धाडस बघून त्याचीच धास्ती वाटायला लागली. त्याची विचारपूस करायला कुणी आलं नाही. चौकशीला ही कुणी आलं नाही. असा हा चिनाप्पा. घरात असूनही बेवारस. जिवंत असूनही नसल्यासारखा.


 चिनाप्पा नववीपर्यंत आमच्या वर्गात होता.  कधी शाळेत यायचा. कधी नाही. नववीच्या सहामाही नंतर तो एकाएकी गायब झाला. वर्गातील तो कोपरा कायमचा रिकामा पडला. त्याने शाळा सोडली.  आम्ही सर्व विसरून गेलो. 


पुढे खूप वर्षांनी एकदा चिनाप्पाचा बाप भेटला. सहज विचारलं तर, म्हणाला " तो घर सोडून गेलाय" जिवंत आहे की नाही हे ही माहित नाही". 


खूप वाईट वाटलं. सावत्र आईची क्रूर वागणूक. बापाची दारू. सावत्र भावांची शिवता शिवत होऊ नये म्हणून धडपड. अपंग शरीर. अधू डोळे. घरदार..आईबाप...भाऊ-बहीण... समाज.. गाव... सगळ्यांतून उठवलेला एक शापित जीव. अर्थच नव्हता जिंदगीला.


पण तरी सहन करत तो जगत होता. आता मात्र कुठे असेल काय माहिती? 


कधीतरी गेट- टुगेदरला चिनाप्पाची आठवण  यायची. वर्गमित्र म्हणायचे, "कुठे असेल काय माहित?" एकजण म्हणाला,.अरे तो यु.पी.त आहे. हरिद्वार, वैष्णोदेवी या साईडला. भिक्षा मागतो. बाप जाऊन पैसे घेऊन येतोय, वगैरे...

 

आज या साईडला फॅमिली ट्रिप आहे.  त्यामुळे चिनाप्पाची आठवण येत होती. 

कदाचित असेल कुठेतरी.....

भेटेल का ? 

ओळखल का ?

त्याची नजर असेल की पूर्ण गेली असेल ?....

पण तो कुठे दिसलाच नाही.


ट्रीपच्या नादात माझ्याही नंतर लक्षातूंन गेलं....


आम्ही मसुरीला गेलो. निसर्ग सौंदर्य अनुभवायला.  तिथे दोन दिवस काढले. नंतर हरिद्वारला जायचं ठरलं. गंगानदीचं महात्म्य अनुभवायला.  


सायंकाळी ४ चा सुमार. आभाळ दाटून आलेलं. आम्ही हरिद्वारला पोहोचलो. रुमवर साहित्य ठेवलं. गंगा नदीवर गेलो. ही$$ गर्दी. नदीचं बर्फासारखं थंड पाणी. घाटावर उभा होतो.  म्हातारीचा कापूस. चणेफुटाणे. आईस्क्रीम. आभाळात उडणारे भोवरे. गाणी म्हणणारे भिकारी.


आम्ही पुढे चालत होतो. थोड्या अंतरावर एक भिकारी गाणं म्हणत होता. दोन्ही पायाने उपडी केलेली बरणी.   त्यावर दोन्ही हाताच्या बोटांनी ढोलकीचा आवाज. "क्या हुआ तेरा वादा" या चालीचं सुरातलं गाणं. माझं लक्ष त्याच्याकडे गेलं.

 .....।।आणि वीजच चमकली.

 लख्खं प्रकाश पडावा तसा मला चिनाप्पा दिसला. होय चिनाप्पाच तो. 


मी पळतच गेलो. त्याच्या हाताला धरलं. त्याने क्षणातच गाणं थांबवलं. किलबिलत्या डोळ्यांनी बघू लागला. मी म्हटलं अरे मी kp . तुझा क्लासमेंट. त्याने माझ्या दोन्ही हाताला धरून गप्पकन् खाली बसवलं. अधू डोळ्यांनी बघू लागला. पण त्याला नीट दिसत नव्हतं. मग त्यानं थोडं जवळ ओढलं. 


काही वेळाने म्हणाला, " काय करतोस आता?  कुठे नोकरी बिकरी लागली का न्हाय ? किती वर्षांनी भेटतोय आपण ?"


मी म्हटलं, "मी आता वकील झालोय". तो थोडा बाजूला झाला.  थोडा वेळ असाच गेला. त्यानं त्याचं सगळं साहित्य गोळा केलं.  बिन टोपणाची बरणी. हातरायची सतरंजी. एक काठी. जर्मनची पाटी. मोकळं पोतं. हातातली दोन कडी. स्टीलचा डबा. गुंडाळून ठेवलेली मळकी लुंगी.  सगळं झोळीत भरलं. झोळी खांद्यावर टाकून तो उठला.  म्हणाला, "या माझ्या मागोमाग". मी म्हटलं, "अरे स्नान करतो.मग जाऊया. पण तो ऐकायला तयार नव्हता. म्हणाला, "मी आता सोडणार नाही. चला लवकर". 

  

आम्ही चालत चालत मेन रोडला आलो. स्टेशन सोडून आणखी पुढे लांब गेल्यावर टॅक्सी उभी होती. दोघेही टँक्सीत बसलो.  टॅक्सी धाऊ लागली. थोडे अंतर गेले.


मी विचारलं,  कुठे निघालोय? तो म्हणाला,  घरी.  माझ्या घरी. स्वतःच्या घरी. 


थोड्या वेळाने मी विचारलं,.गावी का येत नाहीस ?  त्याच्या डोळ्यात टचकन् पाणी आलं. म्हणाला, " नको जखमेवर मीठ टाकूस. मी बेवारस. कोण आहे गावाकडे ?"

 

तो बाहेर बघू लागला. गार वारा सुटलेला. त्याची फाटकी कपडे फडफडतेली....आणि तो सांगू लागला, 


"सहामाईची परीक्षा संपली आणि  मला एका घरात कामाला ठेवलं. आई शाळा सोड म्हणू लागली.  माझा शिकण्याचा आग्रह होता. पण ते ऐकत नव्हते. एके दिवशी आई आणि  भावानं खूप मारलं. रात्रभर उपाशी ठेवलं.  दुसर्‍या दिवशी तोंड सुद्धा धुवू दिलं नाही. हाकलूनच काढलं.


शेजारी-पाजारी गोळा झाले. पण ते तरी काय करणार? 


मग मी गाव सोडलं....


 खुरडत खुरडत दुसऱ्या गावी जायचं. कुणीतरी रुपया दोन रुपये द्यायचे. मग त्याचा भजीपाव घ्यायचा. कुठल्यातरी देवळात झोपायचं. पुन्हा पूढच गाव. मजल-दरमजल करीत इथं आलो.  इथं मला आता २२ वर्षे झाली. पहिल्या पाच-दहा वर्षांतच गावाकडे बातमी कळली.  मी हरिद्वारला आहे. घरपण घेतलय. मग बाप शोधत आला.  गाठ पडल्यावर घरी नेलं. नवीन कपडे घेतले. दोन दिवस ठेवून घेतलं.जाताना हातावर पाच हजार रुपये ठेवले. म्हणलं, प्यायची कमी कर. त्यानंतर महिन्या-दोन महिन्याला गावाकडून कोणीतरी येत राहिलं.  कधी बाप. कधी भाऊ. कधी सावत्र आई. कधी बहीण. कधी कधी सगळं घरदार. 


आता गावाकडचं जुनं घर पाडून नवीन बांधलय. स्लॅबच आहे. थोरल्या भावाचं लग्न झालं. त्यानं बायकोला यातलं काही सांगितलेलं नाही. फक्त पैसे न्यायला येतो. मी पण कधी विचारलं नाही. बाप काही सुधारला नाही. उलट जास्त पेतोय. भाऊ काहीही काम धंदा करत नाही.  माझ्याकडे अधुन मधून येऊन पैसे घेऊन जातात.... 


आम्ही जैहरिकल गावात पोहोचलो. थोड्या वेळाने टॅक्सी थांबली. आम्ही खाली उतरलो. टॅक्सीवाल्याने पैसे घेतले नाहीत. न विचारताच तो निघून गेला. मी मागे वळून बघितलं तर दोन मजली मोठा बंगला. "दानत" बंगल्याचे नाव. माझ्या आश्चर्याला सीमा राहिली नाही. आम्ही आत आलो. चहापान झालं.  म्हणाला," वहिनी आणि मुलांना घेऊन ट्रिप संपेपर्यंत इथेच राहायचं. शपथ आहे तुम्हाला. नाही म्हणू नका. मोबाईल काढला, म्हणाला नंबर सांगा वहिनीचा.


रात्री बाहेरून जेवण मागवलं.सगळी जेवली. गप्पा मारताना म्हणाला दरवर्षी अपंगांना 51 हजार रुपये देतो. गावी पण पैसे देतो. गोरगरिबांना मदत करतो. दिवसभर गाणी म्हणायची. भिक्षा मागायची. कधी मिळते. कधी नाही. पण कधीकधी दोन-दोन हजार मिळतात. जगण्यापुरते ठेवतो. बाकी गरजवंतांना देऊन टाकतो. 


मी म्हणालो, " मग एवढा मोठा बंगला ?"  तो हसत-हसत म्हणाला, "गैरसमज आहे तुमचा. 

हा अंध मुलांचा आश्रम आहे. सध्या १३५ मुले मुली आहेत. भिक्षा मागून मी चालवलाय. सरकारही देणगी देतय.  माझ्यासाठी असं मी काहीच केले नाही. तो भरभरून बोलत होता..... आणि आम्ही  ऐकत होतो. 


नंतर अखंड ट्रीप मध्ये आम्ही कुठल्याच देवाला गेलो नाही. दोन दिवस तेथेच थांबलो. 


तिसऱ्या दिवशी चिनाप्पाच्या पायाला स्पर्श केला. जड अंतकरणाने त्याचा निरोप घेतला. आणि परतीच्या प्रवासाला निघालो.


रेल्वे भरधाव चालली होती. दिवस मावळतीला निघालेला. आभाळ दाटून आलेलं. आत्ता पाऊस सुरू होईल अस झालेलं. वेगळ्याच भावना निर्माण झालेल्या. 


चिनाप्पा डोळ्यासमोरुन हालत नव्हता. आता परतताना प्रश्न पडत होता,  भिकारी कोणाला म्हणायचं?



श्रीमंती कशाला म्हणतात?

 श्रीमंती कशाला म्हणतात? 

 तुमचे मन भरुन येईल ; कदाचीत डोळेही पाणावतील.......

😢😢😢😢😢😢😢


शाळेने पत्रक काढलं,'; यंदाच्या वर्षापासून शाळेतल्या सर्वात गरीब मुलाला आर्थिक मदत द्यायचीबी आहे, तेव्हा शिक्षकांनी प्रयत्नपूर्वक अचूक मुलगा निवडावा,ज्यायोगे ही मदत योग्य विद्यार्थ्याला/विद्यार्थिनीला मिळेल !


आता सर्वात गरीब मुलगा शोधणे म्हणजे, खरोखर पंचाईतच होती. ही छोटी मुलंसुद्धा इतकी नीटनेटकी राहतात की,अगदी एक विजार, एक सदरा असेल,तरी तो रोज धुऊन-वाळवून त्याची इस्त्री केल्यासारखी घडी करून मगच तो घालतात

गरीब मुलगा शोधायचा कसा ? आणि प्रत्येकाला विचारायचं तरी कसं, तुमच्यात कोण गरीब; तेही सर्वात गरीब म्हणून? मोठीच अडचण होती. तीन - चार दिवस नुसता अंदाज बांधण्यात गेले. वयाने मोठ्या माणसांमधे गरीब माणूस शोधणं सोप्पं आहे ;पण लहान मुलांमधे अडचणीचं .शेवटी दोन-चार मुलांना हाताशी घेतलं, जी गाडीने शाळेत यायची

आणि गाडीनेच घरी जायची.


मधल्या सुट्टीत अचानक वर्गात आलो तर ती सफ़रचंद खातांना मला दिसायची. अशा मुलांना विचारलं ," मला एक मदत कराल का? आपल्या वर्गातला सर्वात गरीब.......?"


क्षणाचाही विलंब न करता सर्वानी एकच नाव उच्चारले," सर आपल्या वर्गातला तो मयूर आहे नं, तो सर्वात गरीब आहे."


मुलांनी एका झटक्यात प्रश्न सोडवला होता. "कशावरून म्हणता?" 

" सर. त्याचा सदरा दोन- तीन ठिकाणी तरी फ़ाटलाय. त्याने शिवलाय; पण फ़ाटलेला शर्ट घालतो. त्याची खाकी पॅंट तर नीट बघा , मागून दोन ठिगळं लावलेली आहेत. चपला त्याला नाहीतच. मधल्या सुट्टीत आम्ही डबा उघडतो . तो मात्र प्लॅस्टीकच्या पिशवीतून अर्धी भाकरी आणतो.सर,ती भाकरीही कालचीच असते.भाजी कुठली सर? गुळाचा खडा असतो. आम्ही सांगतो,तो सर्वात गरीब आहे. शाळेने त्याच मुलाला मदत द्यायला हवी ."


मुलं एखाद्या खळाळत्या प्रवाहासारखी पुढे बोलतच राहीली . पण मला ते ऐकू येणे शक्य नव्हते. मयूर एवढा गरीब असेल? की सर्वांनी एकमुखाने त्याच्या गरीबीचे दाखले द्यावेत? कारण, मयूर वर्गातील सगळ्यात चपळ मुलगा होता. अक्षर स्वच्छ, मोकळं होतं. त्या अक्षरात त्याच्या नितळ मनाचे दर्शन मला घडे. एकदा तर त्याची वही मी माझ्या घरात पत्नीला दाखवली आणि म्हट्लं, " पाहिलंस ! हे सातवीतल्या मुलाचे अक्षर.असं अक्षर असावं हे माझे स्वप्न होते.उत्तराला सुबक परीच्छेद, समास सोडून योग्य प्रस्तावना आणि

अखेर करून लिहिलेली उत्तरे........." चे गठ्ठे आणायला मयूर सर्वात आधी धावत यॆई. माझ्याआधी ते गठ्ठे उचलून वर्गात नेण्याचा उत्साह मला थक्क करून टाकत असे......


असा मयूर परिस्थितीने एवढा खचलेला असेल याची कल्पनासुद्धा मला येऊ नये, या गोष्टीचीच मला खंत वाटली .जी गोष्ट माझ्या इतर विद्यार्थ्यांना उमगते आणि मला त्याचा पत्ताही नसतो......अरेरे!..., 

मी खूप कमी पडतोय. मयूर , गेल्या सहलीला आला नव्हता. अवघी पंचवीस रूपये वर्गणी होती; पण त्याचं नाव यादीत नव्हतं. आपण

त्याला साधं विचारलंसुद्धा नाही.


असलेल्या मुलांच्या किलबिलाटात न आलेल्या मयूरची मला आठवणही झाली नव्हती. केवळ पंचवीस रूपये नसल्याने त्याचे National Park बघण्याचे राहून गेले. एका छान अनुभवाला मुकला होता तो. हा आनंद मी हिरावला होता.यादीत मयूरचे नाव नाही म्हणून मी त्याला जवळ का बोलावलं नाही? मयूर स्वत:हून सांगणं शक्यच

नव्हतं आणि माझ्या व्यग्र दिनक्रमात मयूरसाठी जणू वेळच शिल्लक नव्हता!


शिक्षक म्हणून मी एक पायरी खाली आलो होतो. खरंच आहे, मुलांनी सुचवलेलं नाव. आर्थिक मदत, तीही भरघोस मदत मयूरला मिळायलाच हवी. आता शंकाच नव्हती. त्याची गरीबी बघायला त्याच्या घरी जायचेही काहीच कारण नव्हते. मुलांनी एकमुखाने सुचवलेले नाव आणि मयूरने सहलीला न येणं याची सांगड घालून मी मुख्याध्यापकांना नाव देउन

टाकले'; मयूर, सातवीअ, अनुक्रमांक बेचाळीस';


डोळ्यावरचा चष्मा हातात खेळवीत आदरणीय मुख्याध्यापक म्हणाले, " खात्री केलीये ना सर? कारण थोडीथोडकी रक्कम नाही. या विद्यार्थ्याची वर्षाची फ़ी, त्याचे शालेय शिक्षण साहित्य, गणवेश...इत्यादी सर्व या रकमेत सामावणार आहे."


मुख्याध्यापकांना मोठया आत्मविश्वासाने मी म्हटलं, " सर, त्याची काळजीच करू नका. वर्गातला सर्वात गरीब आणि आदर्शही म्हणा हवं तर-मयूरच आहे!"


एका योग्य विद्यार्थ्याची निवड केल्याचे समाधान घेऊन मी निघालो. मयूरला मिळणारी मदत, त्यामुळे त्याचे आर्थिकद्रूष्ट्या सुसह्य होणारे शैक्षणिक वर्ष याची कल्पनाचित्रे

रंगवतांना दिवस कसा संपला ते कळालेच नाही.


दुस~या दिवशी शाळेत लवकरच गेलो. देखण्या अक्षराच्या कदम सरांनी मोठ्या दिमाखाने फ़ळा सजवला होता.त्यावर 'गरीब असूनही आदर्श ' असं म्हणून मयूरचं नाव होतं. शाळा भरली. मी अध्यापक खोलीत बसलेलो होतो. इतक्यात खोलीच्या दाराशी मयूर उभा दिसला. 


त्याच्या चेह~यावरचा भाव समजत नव्हता. राग आवरावा तसा करारी चेहरा... " सर, रागवू नका; पण आधी त्या फ़ळ्यावरचे माझे नाव पुसुन टाका." अरे, काय बोलतोयस तुला समजतय का?" चुकतही असेन मी . वाट्टेल ती शिक्षा करा; पण ते नाव...!!"


त्याच्या आवळलेल्या मुठी, घशातला आवंढा, डोळ्यातलं पाणी......मला कशाचाच काही अर्थ लागेना. मी ज्याचं अभिनंदन करायच्या तयारीत, तो असा.....?


" सर, मला मदत कशासाठी? 

गरीब म्हणून? मी तर श्रीमंत आहे."


त्याची रफ़ू केलेली कालर माझ्या नजरेतून सुटत नव्हती.येतानाच त्याचे अनवाणी पाय पाहिले होते. शाळेच्या चौदा वर्षाच्या माझ्या व्यावसायिक कालखंडात अशी पंचाईत प्रथमच आली होती. 


"अरे पण....?"


"सर,विश्वास ठेवा.मी श्रीमंत आहे.कदाचित सर्वात श्रीमंत असेन...सर, मी गरीब आहे हे ठरवले कोणी? मी चुकतोय बोलतांना हे कळतंय मला; पण सर ते नाव तसंच राहिले तर मी आजारी पडेन आज."


अचानक तो जवळ आला आणि त्याने माझे पायच धरले. त्याला उठवत मी म्हणालो, " ठीक आहे. तुला नकोय ना ती मदत, नको घेऊस; पण तू श्रीमंत आहेस ते कसे

काय?"


" सर, माझ्या अभ्यासाच्या वह्या बघा, कुठल्याही विषयाच्या.... त्या पूर्ण आहेत.पुस्तकं मी Second Hand वापरतोय ...खरयं ! पण मजकूर तर तोच असतो ना? मनात काय उतरवतो ते महत्वाचे नाही का? 

सर, माझे पाचवीपासूनचे मार्क बघा, नेहमी पहिल्या तीनात असतो. गेल्या वर्षी स्पोर्टसपासून निबंधापर्यंत सर्व बक्षिसे मलाच आहेत.

सर...सर,सांगा ना, मी गरीब कसा?"


मयूर मलाच विचारत होता आता मघाचचं दु:खाचं पाणी विरून त्यात भविष्याचं स्वप्न थरारत होतं.


"खरयं मयूर. पण तुला या पैशाने मदतच......."


" सर, मदत कसली? माझी श्रम करण्याची वॄत्तीच नाहीशी होइल. शाळाच फ़ी देतीये म्हटल्यावर, मी वडीलांबरोबर रंगाच्या कामाला जाणं बंद करेन! "


"म्हणजे?"


" वडील घरांना रंग द्यायचे काम करतात. Contractor बोलावतो तेव्हाच काम मिळते. तेव्हा ते मला त्यांच्याबरोबर नेतात. चार पैसे मला मिळतात, ते मी साठवतो. सर, संचयिका आहे ना शाळेची, त्यातलं माझं पासबुक बघा. पुढच्याही वर्षाची फ़ी देता येइल एवढी रक्कम आहे त्यात...


मुलांनी तुम्हाला काहीतरीच सांगितलेले दिसते.....

म्हणून तुम्ही मला निवडलेलं दिसतं. पण सर, मीच नाही तर आमचं घरच श्रीमंत आहे. घरातले सगले काम करतात. काम म्हणज

कष्ट. रंगाचं काम नसतं तेव्हा बाबा स्टेशनवर हमालीही करतात.आई धुणं-भांडी करते. मोठी बहीण दुसरी-तिसरीच्या शिकवण्या घेते. सर, वेळ कसा जातो,दिवस कसा संपतो ते कळतच नाही....शाळेतल्या वाचनलयातली पुस्तकं मीच सर्वात जास्त वाचली आहेत. तुम्हीच सांगितल्याप्रमाणे लेखकांनाही पत्र पाठवतो मी. सर, माझ्या घरी याच तुम्ही, माझ्याकडे पु.ल. देशपांडे यांच्या स्वाक्षरीचं पत्र आहे. ........सर,आहे ना मी श्रीमंत?"


आता तर तो स्मितरेषांनी मोहरला होता. सर, शेजारच्या काकांकडून मी उरलेल्या वेळात पेटीही शिकलो. रात्री देवळात होण्या~ या भजनात मीच पेटीची साथ देतो. भजनीबुवा किती छान गातात! ऐकताना भान हरपून जातं."


त्याच्या सावळ्या रंगातही निरोगीपणा चमकत होता.अभावितपणे मी विचारलं," व्यायामशाळेतही जातोस?"


"सर, तेवढी फ़ुरसत कुठली? घरातच रोज चोवीस सूर्यनमस्कार आणि पन्नास बैठका काढतो ."


अंगावर एक थरार उमटला... कौतुकाचा.


" मयूर मित्रा, मला तुझा अभिमान वाटतो.तुझ्यासारखा श्रीमंत मुलगा माझ्या वर्गात आहे त्याचा .."


" म्हणूनच म्हणतो सर......!"


" हे नाव ज्या कारणासाठी आहे, त्यात तू नक्कीच बसणार नाहीस. आमची निवड चुकली; पण याचं रूपांतर वेगळ्या शिष्यवॄत्तीत होईल. शाळेतील सर्वात अष्टपैलू बुद्धिमान मुलगा म्हणून, हे पारितोषीक तरी........."


" सर, एवढ्यात नाही. त्याला वर्ष जाउ द्या. मी लिंकनचं, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे चरित्र वाचलं, हेलन केलरचं महात्मा फुले यांचे चरित्र वाचलं.सर, हे वाचलं की कळतं की ही माणसे केवढे कष्ट करून मोठी झाली. माझ्यासारख्या मुलांना प्रोत्साहन द्या, योग्य वयात ते परखड मार्गदर्शन करा; पण सर, नको त्या वयात असा पैसा पुरवत गेलात तर घडायचं राहूनच जाईल. जे काय करतोय ते पैशासाठी असे हॊऊन जाईल... सर.....प्लीज.....!"


वाचनानं, स्पर्धांतल्या सहभागानं , कलेच्या स्पर्शानं, कष्टानं....... त्याच्या वाणीला प्रगल्भतेची खोली होती, संस्कारामुळे नम्रतेची झालर होती. आता मला माझ्या समोरचा मयूर जाधव स्पष्ट दिसतही नव्हता. त्याच्याबद्दलच्या कौतुकाचे अश्रू माझ्या डोळ्यात दाटले होते.


शाळेतला सर्वात श्रीमंत मुलगा माझ्यासमोर उभा होता. परिस्थिती पचवून, परीश्रमाने स्वत:वर पैलू पाडणारा ! श्रीमंत


====================